मुंबई : ‘भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस देण्यात यावे,’ अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. या मागणीसाठी लवकरच रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस देण्यात यावे, ही मागणी मागील दहा वर्षांपासून रिपब्लिकन पक्ष करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी मुंबई राहिली आहे. मुंबईत त्यांचे वास्तव्य प्रदीर्घ काळ होते. त्यांनी उभारलेला मानवमुक्तीचा लढा मुंबईतून त्यांनी लढविला. मुंबईत त्यांच्या अनेक आठवणी आहेत. त्यामुळे मुंबई सेंट्रल या पश्चिम रेल्वे वरील मोठया महत्त्वपूर्ण टर्मिनसला त्यांचे नाव द्यावे, अशी आंबेडकरी जनतेची अनेक वर्षांपासून मागणी आहे.’
‘मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे; तसेच मध्य रेल्वेच्या व्हिक्टोरिया टर्मिनसचे (व्हीटी) नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे नामांतर करण्यात आले आहे. त्या नामांतराचे आंबेडकरी जनतेने स्वागत केले असून, आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मध्ये रेल्वे टर्मिनसला दिल्याबद्दल अभिमान वाटत आहे. त्याप्रमाणे मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, अशी ‘आरपीआय’ची मागणी आहे. ही मागणी मंजूर करून मुख्यमंत्र्यांनी मुंबई सेंट्रल टर्मिनसचे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे टर्मिनस असे नामांतर करण्याचा ठराव राज्य सरकारतर्फे रेल्वे मंत्रालयाला त्वरित पाठवावा, यासाठी आपण मुख्यमंत्री फडणवीस, आणि रेल्वेमंत्री गोयल यांची लवकरच भेट घेणार आहोत,’ असे आठवले यांनी सांगितले.